तासगाव तालुक्यात चारा बियाणे वाटपात घोटाळा : अमोल काळे
अनेक गावे व शेतकरी वंचीत, मनसेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन, चौकशी करून कारवाईची मागणी
तासगाव:रोखठोक न्यूज
सांगली जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांना चारा बियाणे वाटपात तासगाव तालुक्यात घोटाळा झाला आहे. शासकीय नियम फाट्यावर मारून राजकीय बगलबच्चांना व जनावरे नसलेल्या व्यक्तींना याचा लाभ दिला आहे. हे बियाणे शेतकऱ्यांना व गावांना पोहोचले नाही. या घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी मनसे नेते अमोल काळे यांनी केली आहे. यासंबंधी गटविकास अधिकारी तासगाव त्यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की
सांगली जिल्ह्यातील दुभत्या जनावरांसाठी उन्हाळ्यात ओला चारा उपलब्ध व्हावा या हेतूने शेतकऱ्यांना जिल्हा परिषद सांगली यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना चारा बियाणे वाटप कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार १८ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याचे वाटप पशुसंवर्धन विभागाकडून सर्व तालुक्यांना करण्यात आले.
मात्र तासगाव तालुक्यात या बियाणे वाटपात मोठा घोटाळा झाला आहे. हे बियाणे शेतकऱ्यांना न देता गावा गावातील राजकीय बगलबबच्यांना त्याचे वाटप केले आहे. नियम धाब्यावर बसवून जनावरे नसनाऱ्यांनाही त्याचे वाटप करण्यात आले आहे. लाभार्थ्यांची निवड गरज बघून करण्याऐवजी मर्जीतील लोकांनाच बियाणे देण्यात आले आहे बियाणे आल्याची माहिती गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली नाही अनेक गावे मोफत बियाण्यांपासून वंचित राहिलेली आहेत या बियाणे वाटपाची सखोल चौकशी करावी अनेक शेतकऱ्यांकडे बियाणे दिल्याच्या नोंदी आहेत मात्र संबंधित शेतकऱ्यांकडून मका पेरणी झालेली नाही त्यामुळे याची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी नेता मनसे स्टाईल आंदोलनचा इशारा अमोल काळे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सांगली यांना निवेदन दिले आहे.
बस्तवडे दवाखान्याला संलग्न गावे सहा; लाभ दोनच गावांना
बस्तवडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत सहा गावांचा समावेश आहे. मात्र त्यापैकी केवळ दोनच गावात बियाणे वाटप झालेले आहे अन्य गावांना याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. बियाणे वाटप करताना मर्जीतील लोकांनाच बियाणे देण्यात आले आहे. हे एक प्राथमिक स्वरूपाचे उदाहरण आहे. असाच कारभार तालुक्यातील अन्य ठिकाणीही झाला आहे.
पशुधन पर्यवेक्षक व कर्मचारी गायब:
तालुक्यात असणाऱ्या सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक व कर्मचारी नावालाच उपस्थित लावत असतात. त्यांच्या कक्षात येणाऱ्या अनेक गावात ते सहा सहा महिने फिरकत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना खाजगी डॉकटरांवर अवलंबून राहावे लागते. अनेक ठिकाणी वेळेत उपचार मिळाले नसल्यामुळे जनावरे दगावण्याच्या घटनाही घडल्या आहेत पशुसंवर्धन विभागाच्या बेलगाम कारभाराला लगाम घातला नाही. तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा काळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.