मुंबई : रोखठोक न्यूज
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टी-२० विश्वचषक विजेत्या संघाच्या सदस्यांसाठी पुरस्कार जाहीर केले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी-२० विश्वचषक विजेत्या संघाला १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडियावर पैशांचा पाऊस पडत आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाला कोट्यवधी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रविवारी विजेत्या संघासाठी १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. भारताच्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये योगदान दिल्याबद्दल खेळाडू आणि सर्व कोचिंग स्टाफचे अभिनंदन केले.
जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि इतर खेळाडूंच्या मदतीने त्यांनी १.४ अब्ज भारतीयांची स्वप्ने आणि अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.’ संघाने आपल्या सातत्यपूर्ण चमकदार कामगिरीने आपल्या टीकाकारांचे तोंड बंद केले आहे. संघाचा प्रवास एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही आणि आज ते दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाले आहेत.
दरम्यान या विश्वचषकासह रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.