सावळजच्या शैक्षणिक क्षितिजावर यशाचा तिरंगा; महात्मा गांधी विद्यालयला राज्यस्तरीय A+ मानांकन

तासगाव,रोखठोक न्यूज
“कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा…” या ओळींचा प्रत्यय देणारी अभिमानास्पद कामगिरी तासगाव तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय, सावळजने दाखवली आहे. महाराष्ट्र शासनामार्फत SQAAF अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये झालेल्या कठोर मूल्यांकन प्रक्रियेत विद्यालयाने A+ (अ+) श्रेणी मिळवत गुणवत्तेचा मानाचा तुरा रोवला आहे.
राज्यभरातून तब्बल १,०२,६७५ शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केले. त्यापैकी १०,७१२ शाळांची बाह्य मूल्यांकनासाठी निवड झाली आणि १०,६४४ शाळांचे बाह्यमूल्यांकन पूर्ण झाले. या स्पर्धात्मक प्रक्रियेतून संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ ४२९ शाळांना A+ श्रेणी बहाल करण्यात आली. या मानांकनात तासगाव तालुक्यातील एकमेव विद्यालय म्हणून सावळजच्या या शाळेने मान पटकावला आहे.
ही कामगिरी केवळ गुणपत्रिकेतील आकडे नसून, गुणवत्तापूर्ण अध्यापन, शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आणि सर्वांगीण विकासाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. “ज्ञानदीप तेजोमय झाला; गौरवाचा क्षण अवतरला,” अशा शब्दांत मुख्याध्यापक मांडके जे. आर. यांनी आनंद व्यक्त करत ही माहिती दिली.
या यशामुळे सावळज व परिसरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
ग्रामीण भागातही गुणवत्तेचा झेंडा उंचावता येतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे सावळजचे महात्मा गांधी विद्यालय . रयत शिक्षण संस्थेच्या संस्कारांची परंपरा आणि शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जिद्दीच्या बळावर सावळजने आज राज्याच्या शैक्षणिक नकाशावर आपले स्थान अधिक ठळक केले आहे.



