चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा: उपमुख्यमंत्री अजित पवार
केंद्रसरकारकडे पत्राद्वारे मागणी ; आ. जयंत पाटील व आ. रोहित पाटील यांच्या लक्षवेधीची राज्य शासनाकडून दखल

तासगाव, प्रतिनिधी
चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आणि परकीय गंगाजळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तात्काळ थांबवावी. बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहून केंद्रसरकारकडे केली. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आ. जयंत पाटील व आ. रोहित पाटील यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात नेपाळ मार्गे चीनमधून येणाऱ्या बेकायदा बेदाणा आयातीबाबत मांडलेल्या लक्षवेधीची दखल राज्य शासनाने घेतली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच केंद्रीय व्यापारमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले असून महाराष्ट्रातील आणि देशातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. चीनमधून निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यांची बेकायदा आयात वाढली आहे. आयात कर आणि शुल्क चुकवून बेदाणे मोठ्या प्रमाणावर भारतात आणले जात आहेत. या करचोरीमुळे शासनाचा महसूल बुडत असून देशाच्या महसुलाचे नुकसान होत आहे. ऐन हंगामात होत असलेल्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बेदाण्यांचे दर प्रतिकिलो शंभर ते सव्वाशे रुपयाने घसरले आहेत. याचा फटका द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांना बसला असून त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. हे टाळण्यासाठी केंद्रसरकारने तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. बेकायदा आयात व विक्री थांबवण्यासाठी कठोर कारवाई करावी.

आयात होणाऱ्या बेदाण्यांचा दर्जा तपासण्यासाठी तसेच करवसुली योग्य, अचूक होण्यासाठी बंदरे, विमानतळ, बाजारपेठांच्या ठिकाणी तपास व करवसुली यंत्रणा कार्यक्षम करावी. ऐन हंगामात बाजारातील बेदाण्यांचे दर स्थिर राखून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच केंद्रीय व्यापारमंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
आ. रोहित पाटील यांनी द्राक्ष बागायतदारांच्या समस्या व चीन मधून बेकायदा आयात होणाऱ्या बेदाण्याबद्दल विधिमंडळात मांडलेल्या आक्रमक लक्षवेधीत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना धारेवर धरले होते. त्यांच्या लक्षवेधीची चर्चा राज्यभर झाली होती. दरम्यान, आ. जयंत पाटील, आ.रोहित पाटील व द्राक्ष बागायतदार संघ यांच्या संयुक्त मागणीची तात्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा अशी केंद्रसरकारकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.



