
तासगाव :रोखठोक न्यूज नेटवर्क
गणपती बाप्पा मोरया! मोरया ! मोरया… च्या जयघोषात तासगावच्या सिद्धिविनायकाचा 245 वा रथोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. लाखो भाविकांचा अलोट उत्साह पाहायला मिळाला. रथयात्रा तब्बल तीन साडेतीन तास सुरू होती. तासगावच्या पटवर्धन संस्थानच्या श्री गणपती पंचायतन श्री सिद्धिविनायकाचा हा 245 वा रथोत्सव आज उत्साहात साजरा झाला. मराठा साम्राज्याचे शेवटचे सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन सुरू केलेल्या या रथयात्रेला राज्यभरातून गणेश भक्त उपस्थिती लावतात. तीन मजली लाकडी कोरीव काम केलेल्या रथातून श्री सिद्धिविनायक आपल्या वडिलांना भेटण्यासाठी श्री काशीविश्वेश्वर मंदिरात जातात, अशी आख्यायिका आहे. लोखंडी चाके असलेला हा रथ हजारो भाविक दोरखंडाच्या सहाय्याने हाताने ओढत नेत असतात.
आज दीड वाजता श्रींची पंचधातूची उत्सवमूर्ती रथात आणण्यात आली. गणपतींची आरती आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर रथ ओढणारे हजारो युवक प्रसादाची मागणी करत होते. रथातून नारळाचे खोबरे, पेढे आणि गुलाल यांची प्रसाद म्हणून उधळण करण्यात येत होती. पुढे सरकत रथ साडे तीन वाजता श्री काशीविश्वेश्वर मंदिर पर्यत पोहोचला. तेथे श्रींची आरती होवून रथ परत मंदिराकडे माघारी आणण्यात आला. रथयात्रा साडे चार तास सुरू होती. पटवर्धन संस्थानिक राजेंद्र पटवर्धन, डॉ. आदिती पटवर्धन यांनी रथाचे सारथ्य केले. रथामधे मंदिराच्या विश्वस्तासह मानकरी बसलेले होते.गतवर्षी प्रमाणे यंदाही रथयात्रेच्या सुरुवातीला झालेल्या वादामुळे रथयात्रा उशिरा सुरू झाली.

रथायात्रेसाठी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभुराजे देसाई, खा.विशाल पाटील,आ. सुमनताई पाटील, माजी खा. संजय पाटील,पृथ्वीराज पाटील,रोहित पाटील, प्रभाकर पाटील हे उपस्थीत होते. संस्थानिक राजेंद्र पटवर्धन, डॉ. आदिती पटवर्धन यांनी रथाचे सारथ्य केले. सायंकाळी राजवाड्यात रथाचे मानकरी यांना मानाचे नारळ देऊन रथयात्रा पर पडली.
तासगावच्या गणपती रथोत्सवासाठी आज वरुण राजाने ही उपस्थिती लावली. दुपारी रथयात्रा सुरू झाल्यानंतर तासगाव मध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. गुलाल खोबऱ्याची उधळण व अवकाशातून होणारा मुसळधार पाऊस याने भाविकांचा उत्साह आणखीनच द्विगुणीत झाल्याचे पाहायला मिळाले. भर पावसात रथोत्सवाचा आनंद सर्वांनी लुटला.


