ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड होणार बंद
३० जून अंतिम मुदत ; रेशन दुकानात जाऊन करा ई-केवायसी

तासगाव,रोखठोक न्यूज
आता शासकीय योजनेच्या लाभार्थी असलेल्या प्रत्येकाला ई केवायसी (Ration Card e KYC) करणे अनिवार्य आहे. मग आधार असो, बँकेचे काम असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो, प्रत्येक ठिकाणी ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. अशातच अनेक नागरिकांकडे असणाऱ्या रेशनकार्ड बाबत देखील ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. तासगाव तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारकांनी ३० जून अखेर आपले रेशन कार्ड एक केवायसी करून घ्यावे असे आवाहन तासगाव तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे.
प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई-केवायसी (e KYC) करणे बंधनकारक झाले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे तासगाव पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेशनकार्ड (ration Card) धारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेशन दुकानात जाऊन करा ई-केवायसी
रेशनकार्ड धारकांना आपल्या गावातील रेशन दुकानातून धान्य मिळते. याच धान्य दुकानात ई- केवायसी करण्याची सोय आहे.या रेशन दुकानदारांकडे फोर-जी ईपॉस मशीन आहेत, या मशीनद्वारे ही केवायसी केली जाते.यासाठी आधार कार्ड घेऊन जाणे. या ठिकाणी या मशीनमध्ये आधार क्रमांक टाकला जातो.यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
ई- केवायसी नसलेले रेशन कार्ड होणार बंद
30 जून पर्यंत ज्या ग्राहकांचे रेशन कार्ड ई-केवायसी होणार नाही. त्यांचे कार्ड बंद करण्यात येणार आहे. तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ ही मिळणार नाही. शासनाने ई केवायसी सर्वांसाठी बंधनकारक केली आहे.



