राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार!

मुंबई :प्रतिनिधी
गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्याला गुरुवारपासून ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्याला शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पुढील दोन ते तीन दिवस कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढलेला असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास १ लाख ३८ हजार २६२.५४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने समोर आली आहे. यात एकूण १२७ तालुके बाधित झाले असून २५ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असल्याची माहिती पीक पाहणी अहवालाच्या माध्यमातून उजेडात आली आहे, काही भागांमध्ये शेतकऱ्यांना ओला दुष्काळाचा सामना करावा लागला आहे.



